In Short
औरंगाबादच्या मार्केटिंगसाठी शुक्रवारी बौद्ध परिषदेनिमीत्त २९ देशातील २०० प्रतिनिधी येणार
२३ ते २६ ऑगस्ट दरम्यान सहाव्या जागतिक बौद्ध परिषदेचे आयोजन, २४ रोजी अजिंठ्याला भेट
भारतात बौद्ध पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी केंद्रिय पर्यटन मंत्रालयाच्या पुढाकाराने २३ ते २६ ऑगस्ट दरम्यान जागतिक बौद्ध परिषदेचे तब्बल २९ देशांतील २०० हून अधिक प्रतिनिधी भारतात येणार आहेत. चार दिवसांच्या परिषदेतील एक दिवस हे प्रतिनिधी अजिंठ्याला भेट देऊन पर्यटन वाढीसाठी स्थानिक व्यावसायीकांशी चर्चा करतील. आतापर्यंत बिहार आणि उत्तरप्रदेशात होणाऱ्या परिषदेतील एक दिवस औरंगाबादेत आेढून अाणण्यात राज्याच्या पर्यटन खात्याला यश आले आहे.
भारतात मोठ्या प्रमाणात बौद्ध साईट्स आहेत. मात्र, मोठ्या प्रमाणात पर्यटकांना आकर्षित करण्यात त्या कमी पडत आहेत. या ठिकाणांची जागतिक स्तरावर मार्केटिंग करण्यासाठी दर दोन वर्षांनी केंद्रिय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने जागतिक बौद्ध परिषदेचे (इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्क्लेव्ह) आयोजन केले जाते. आतापर्यंत िबहार आणि उत्तरप्रदेशातच ही परिषद होत होती. दिल्लीत एका बैठकीत राज्याच्या पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांनी अजिंठा, वेरूळच्या मार्केटिंगसाठी औरंगाबादेत बौद्ध परिषद घेण्याची मागणी केली. ती अंशत: मान्य करत चार पैकी एक दिवस अजिंठ्यात परिषदेला मंजूरी मिळाली. यंदा केंद्रासोबत महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि बिहार सरकार परिषदेचे आयोजक आहेत.
२४ रोजी अजिंठ्यात महाकुंभ
सहावी जागतिक बौद्ध परिषद २३ ते २६ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. याचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिल्लीत होईल. यावेळी landofbuddha.in या वेबसाईटचे तसचे एका माहितीपटाचे अनावरण होईल. परिषदेला बांग्लादेश, इंडोनेशिया, म्यानमार आणि श्रीलंकाचे मंत्री येतील. तर यासह आॅस्ट्रेलिया, बांग्लादेश, भूतान, ब्राझील, कॅनडा, अमेरिका, इंग्लंड, व्हिएतनाम, जर्मनी, हाँगकाँग, मलेशिया, म्यानमार, नेपाळ, नॉर्वे, रशिया, सिंगापोर, स्पेन, तैवान, थायलैंड, लाओस, कंबोडीया, चीन, तिबेट, मंगोलिया, जपान, दक्षिण कोरीया, तैवान अशा २९ देशांतील टूर ऑपरेटर्स, बौद्ध भिक्खु, अभ्यासक, संशोधक, शासकिय अधिकारी आदी उपस्थित राहतील.
२३ ला दिल्लीत उद्घाटनानंतर २४ रोजी चार्टेड विमानाने औरंगाबादेत आणि वाहनाने अजिंठ्याला जातील. तेथे सकाळी अजिंठा पर्यटक केंद्रात तब्बल ३५ स्थानिक स्टेक होल्डर्स व्यवसाय वाढीसाठी चर्चा करतील. दुपारी १ ते ५ पर्यंत लेणी बघतील. संध्याकाळी औरंगाबादेत विश्राम करून २५ ला पहाटे बौद्ध गयाला जातील. २६ रोजी सारनाथला भेट देऊन परिषदेचा समारोप होईल. यापूर्वीच्या परिषदा २००४ मध्ये दिल्ली आणि बोधगया, २०१० मध्ये नालंदा आणि बोधगया, २०१२ आणि २०१४ मध्ये वाराणसी आणि बोधगया तर २०१६ मध्ये सारनाथ आणि वाराणसीमध्ये आयोजित करण्यात आली होती. पाहुण्यांच्या स्वागतासाठी मराठी मातीची माहिती देणारा आरती पाटणकर यांच्या संचाचा एक सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.