Happenings
प्रेमप्रकरणातून केेले मित्राचे अपहरण.
अपहरणकर्त्यांना अटक करून उस्मानपूरा पोलिसांनी केली अपह्रत तरूणाची मुक्तता
आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास उस्मानपुरा येथील गोपाल टी जवळ प्रेमप्रकरणातून मित्राचे अपहरण केल्याची घटना घडली. अपहरण करून नेणाऱ्या दोन जणांना उस्मानपुरा पोलिसांनी अटक करून अपह्रत तरूणाची सोडवणूक केली. अमोल दिलीप अंभोरे (वय २६,रा. भगतसिंगनगर, मयुरपार्क) आणि सागर विष्णू खंडागळे (वय २४,रा. सातारा परिसर)अशी आरोपींची नावे आहेत. भावेश संजय सोनवणे (वय २२) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावेशला अमोल आणि विष्णू यांनी आज सकाळी क्रांती चौकात भेटण्यास बोलावले. यावर भावेश तक्रारदार अक्षयला सोबत घेऊन क्रांती चौकात गेला. येथे अमोल आणि विष्णू आले असता त्यांनी भावेशकडून त्याचा मोबाईल घेतला. अमोलने भावेश आणि त्याच्या माजी प्रेयसीची चॅटींग मोबाईलमध्ये पाहिली. ती सर्व चॅटींग डिलीट करत त्याने अक्षयला तिथेच थांबवत भावेशला कारमध्ये बसवून अज्ञातस्थळी नेले. या प्रकारानंतर अक्षयने भावेशला फोन लावला असता तो बंद असल्याचे कळले. यामुळे अक्षयने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी झटपट कारवाई करून अपहरणकर्त्यांना निरालाबाजार येथे पकडले. आरोपींच्या ताब्यातून भावेशची मुक्तता करून अपहरणकर्त्यांनी गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे.