Happenings
वाळूज एमआयडीसीत झालेली तोडफोड मराठा आंदोलकांनी केलेली नाही. काही जणांचा आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न – विनोद पाटील
१५ ऑगस्ट पासून एकवेळ चूलबंद आंदाेलन.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी शहरात पत्रकार परिषद आयोजित केली होती. वाळूज एमआयडीमध्ये ७० कंपन्यात झालेली तोडफोड मराठा आंदोलकांनी केलेली नाही. मराठा क्रांती मोर्चाचा बंद औरंगाबाद शहरात अत्यंत शांततेत सुरू होता. दिवसभर मराठा समाज सहकुटुंब रस्त्यावर ठिय्या देत होता. शिवाय बंदची सांगताही राष्ट्रगीत आणि जिजाऊ वंदनाने करण्यात आली. या तोडफोडीशी आमचा काहीही संबंध नाही. काही जणांतर्फे आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या परिसरांत हिंसा कोणी केली, याची सीआयडी चौकशी करावी व आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी यावेळी विनोद पाटील यांनी केली. वाळूज एमआयडीसीमध्ये अनेक कंपन्यांमध्ये मराठा तरूण मोठ्या प्रमाणात रोजंदारीवर आहे. त्यामुळे या कंपन्यांवर मराठा तरूण हल्ला करूच शकत नाही. या शहरात उद्योग यावेत व तरूणांच्या नोकरीचा प्रश्न सुटावा, अशीच आमची इच्छा आहे. रोजगाराच्या प्रश्नावरच मराठा आंदोलन केले जात आहे. असे असताना याच कंपन्यांवर आम्ही हल्ला का करू, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच हा हल्ला केवळ उद्योगांवर नसून शहराच्या अस्मितेवर आहे, असे ते म्हणाले. तसेच यावेळी विनोद पाटील यांनी वाळूज एमआयडीसीमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. ‘उद्योजकांनी हाक दिल्यास आम्ही अर्ध्यारात्रीही त्यांना मदत करण्यास तयार आहोत. पत्रकार परिषदेनंतर आपण उद्योजकांशीही चर्चा करणार आहोत. यावेळी त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करू, अशी माहिती पाटील यांनी दिली.
यावेळी रवी काळे, विजय काकडे, सुरेश वाकडे, नगरसेवक राजेंद्र जंजाळ, किशोर चव्हाण, रमेश गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, अॅड. सुवर्णा मोहिते, सुकन्या भोसले उपस्थित होते.
आंदोलनाच्या पुढील दिशेबद्दल विनोद पाटील यांनी राज्यभरात १५ ऑगस्टपासून मराठा क्रांती मोर्चा आत्मक्लेश आंदोलन करणार आहे. एकवेळ चूल बंद असे या आंदोलनाचे स्वरूप असणार आहे.