Features
सारोळा हिल स्टेशनवर शक्य आहे रोपवे, वॉटर स्पोर्ट्सचा थरार
सारोळ्याच्या डांेगर आणि हिरवागार निसर्ग डोळ्यात साठवण्यासाठी हजारो पर्यटक येथे गर्दी करतात. वनखात्याने येथे काही सुविधा विकसीत केल्या असल्या तरी सारोळ्यात पर्यटन विकासासाची मोठी संधी आहे. जलसंधारण, वृक्षसंवर्धन आणि वनसंवर्धनातून पर्यावरणाचे रक्षण आणि त्यातून पर्यटनाचा विकास शक्य आहे. थोडी कल्पकता आणि मोठी इच्छाशक्ती दाखवली तर सारोळ्याचा कायापालट होऊ शकतो. एक आजोबा १५ वर्षांपासून ही बाब शासनाला पटवून देण्यासाठी झटत आहेत. त्यांच्या कल्पना सत्यात उतरल्या तर सारोळा हे राज्यातील प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला येऊ शकते.
भानुदास धोंडीबा भोसले १५ वर्षांपासून सारोळ्याच्या विकासासाठी संघर्ष करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या रूरल ब्रॉडकास्टींग डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आणि मािहती व जनसंपर्क खात्यात ३८ वर्षांची सेवा करून ते निवृत्त झाले. नोकरीनिमीत्त अनेक ठिकाणी फिरणे झाले. पर्यटनामुळे छोट्या शहरांनीही विकास साधल्याचे त्यांच्या लक्षात आले. शहरापासून अवघ्या २० किलोमीटरवर फुलंब्री रोडवर सारोळा हे सर्वांगसुंदर, निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. वनखात्याने येथे थोड्या सुविधा सुरू केल्या आहेत. परंतू सारोळ्यात पर्यटन विकासाची आणखी मोठी संधी आहे. भानुदास भाेसले यांनी कल्पकता वापरून सारोळ्याच्या विकासाचा मास्टर प्लॉन तयार केला आहे.
रोपवेचा थरार
रायगड, माथेरान , महाबळेश्वर, श्रीवर्धन आणि सापुतारा येथील रोप वे पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे. सारोळ्यातही दोन डोंगरं एकमेकांसमोर उभी अाहेत. त्यांना जोडण्यासाठी रोपवे केला तर पर्यटकांची गर्दी वाढेल. यातून शासनाला मोठ्या प्रमाणात उत्पन्नही मिळेल.
धरणासाठी उपयुक्त
देवगिरी किल्ल्याप्रमाणे सारोळ्याच्या डोंगर पायथ्याच्या चोहीबाजूने खंदक खोदावे. डोंगरावर प्रवेश करण्यासाठी मोजकेच रस्ते ठेवावेत. यामुळे वनसंपत्तीची होणारी चोरी टाळता येऊ शकेल. नेमका रस्ता असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांवर लक्ष ठेवणे सोपे जाईल. दोन्ही बाजूने डोंगर असल्याने याची रचना धरणासाठी उपयुक्त आहे. पावसाळ्यात डोंगरावर पडणारे पाणी साठवणे सोपे आहे. या पाण्यात वॉटर स्पोर्ट्स खेळता येऊ शकतात. साठवलेल्या पाण्यावर पाट काढून आजूबाजूच्या जंगलात पेरू, आंबा, चिंच, जांभूळ याच्या बागा फुलवाव्यात. जंगलात फिरण्यासाठी रस्ते करावेत. काही वर्षातच ही झाडे मोठी होऊन पर्यटकांना दाट वनात फिरण्याचा नैसर्गिक आनंद देऊ शकतात.
बागडे नानांनी लक्ष द्यावे
सारोळ्यात जलसंधारण, वृक्षसंवर्धन, वनसंवर्धन, पर्यावरणाचे रक्षण आणि त्यातून पर्यटन विकास शक्य आहे. अातापर्यंत अनेक शासकिय कार्यालयाचे उंबरठे झिजवले. पण कोणीच दाद नाही दिली. औरंगाबादला राज्याच्या पर्यटन जिल्याचा दर्जा मिळाला आहे. हरिभाऊ बागडेही इथलेच आहेत. यामुळे ते वैयक्तीक लक्ष देऊन सारोळ्याचा कायापालट करतील, अशी अपेक्षा आहे. यातून शासनाला उत्पन्न मिळेल शिवाय नजीकच्या गावात सुबत्ता येईल.-भानुदास भाेसले, निवृत्त शासकिय कर्मचारी
हर्सूलहून ट्रेकिंगचा पर्याय
औरंगाबादहून सारोळ्याला जाण्यासाठी सुमारे २५ किलोमीटरचे अंतर कापावे लागते. परंतू हर्सूलमार्गे कृष्णापूर-कोलठाण येथून गेल्यास सारोळ्याच्या डोंगराचा पायथा लागतो. येथून ट्रेकिंग करून डोंगर चढता येऊ शकतो. तसे केल्यास हे अंतर अवघ्या ५ किलोमीटरवरच उरते. निसर्गभ्रमंतीसोबत ट्रेकिंगचाही अनुभव घेता येतो.
१५ वर्षांपासून पाठपुरावा
भानुदास भोसले यांना १५ वर्षांपूर्वीच सारोळ्याची क्षमता लक्षात आली होती. इथला पर्यटन विकास, पर्यावरणाचे संवर्धन आणि जलसंधारणासाठी आवश्यक बाबींचा त्यांनी अभ्यास केलाय. तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना दोन पानी पत्र लिहून त्यांनी यासाठीचा १५ कलमी कार्यक्रम पाठवला होता. जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त, महसूल विभाग, वनखाते आणि कृषी खात्यालाही प्रस्ताव दिले. परंतू कोणीच दाद दिली नाही. आताचे विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे फुलंब्री मतदारसंघातील आहेत. सारोळा त्यांच्या मतदारसंघात येत असल्याने भाेसले यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. लवकरच ते बागडे यांच्यासमोर हा प्रस्ताव मांडणार आहेत.