Breaking News
तुरळक अपवाद वगळता औरंगाबादेत बंदला १०० टक्के प्रतिसाद
दुकाने उघडली, महामार्गही झाले मोकळे, वाळूजमध्ये तणाव
मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला औरंगाबादेत उत्तम प्रतिसाद मिळाला. क्रांती मोर्चाने आवाहन केल्याप्रमाणे कोठेही हिंसाचाराची घटना घडलेली नाही. तर जाळपोळ आणि रेल्वे रोकोसारखे तुरळक अपवाद वगळता बंद शांततेत पार पडला. संध्याकाळी साडेपाच वाजेपासूनच दुकाने उघडण्यास सुरूवात झाली. तर रस्त्यावरील वाहतूकी सामान्य झाली. वाळूजमध्ये मात्र काही ठिकाणी परिस्थिती तणावपूर्ण आहे.
अारक्षणाच्या मागणीसाठी आज ९ आॅगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधत मराठा क्रांती माेर्चाने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. सकाळी ६ वाजेपासूनच औरंगाबाद शहरात येणाऱ्या महामार्गांवर क्रांती माेर्चाचे कार्यकर्ते जमा झाले. रस्त्यावर ठिय्या देत वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला. जळगाव टी-पाईंट, केंब्रिज चौक, झाल्टा फाटा, महानुभव चौक, बीड बायपाय या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी ११ नंतर कार्यकर्ते शहरातील महत्वाच्या चौकातही दाखल झाले आणि शहरातंर्गत वाहतूकही रोखली. यामुळे नागरीकांची गैरसोय झाली. क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते हात जोडून परत जाण्याची विनंती करत होते. कंपन्यांच्या बसलाही सकाळीच रोखण्यात आले. यामुळे चारही औद्योगिक वसाहतीत कंपन्या बंद होत्या.रूग्णवाहिका, डॉक्टर, रूग्ण, महिला आणि ज्येष्ठ नागरीकांना आंदोलक रस्ता देतांना दिसले.
शाळा, बाजारपेठ बंद
बंदला प्रतिसाद देत शहरातील सर्वच बाजारपेठ बंद होती. मोंढा, टॉकीज, मॉल, शाळा, महाविद्यालये दिवसभर बंद होती. तर शासकिय कार्यालयात तुरळक संख्या दिसून आली. न्यायालय सुरू होते. मात्र, तेथेही गर्दी नव्हती. एसटीने बस बंद ठेवल्याने मध्यर्वती आणि सिडको बस स्थानकावर शुकशुकाट होता. रेल्वे स्टेशनवरही फार गर्दी दिसून आलेली नाही.
वाळूजमध्ये हिंसाचार
शहर शांत असतांंना वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये सकाळपासूनच आंदोलक सक्रिय होेते. अनेक ठिकाणी कंपन्यांच्या शिफ्टच्या बसला लक्ष्य करण्यात आले. यामुळे अनेक बस कंपन्यात न जाता रस्त्यातूनच परतल्या. दुपारी एका पोलिस व्हॅनवर दगडफेक झाल्याचे वृत्त आहे. तर एक पाेलिस व्हॅन, २ कंटेनर, १ दुचाकी आणि एका कंपनीची व्हॅनही जाळण्यात आली. स्टरलाईट कंपनीवरदगडफेक करत या ठिकाणी एक रूग्णवाहिका पेटवण्यात आली, २५ कंपन्यांची तोडफोड केल्याचे वृत्त आहे. जमावाला पांगवण्यासाठी हवेत ६ गोळ्याच्या फैऱ्या झाडण्यात आल्या. तसेच अश्रूधूराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. संध्याकाळपर्यंत परिस्थिती तणावपूर्ण होती.