औरंगाबाद : शहरातील दि मलकापूर को-ऑपरेटिव्ह बँकेवर बुधवारी रात्री आठ वाजता शॉर्टटर्म नोटिस दिल्याने गुरुवारी सकाळी खातेदारांनी बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कर्जाची वसुली कमी प्रमाणात झाली असल्यामुळे बँकेला आरबीआयने नोटीस दिली असल्याची माहिती बँकेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
गुलमंडी येथे मलकापूर बँकेची मुख्य शाखा आहे. या शाखेत ५० हजारांपेक्षा जास्त खातेदार आहे. बँकेने अनेकांना मोठ्याप्रमाणात कर्ज वाटप केले आहे. त्याकर्जाची वसुली न झाल्याने बँकेचा एनपीए ४०% च्या वर गेला. वसुली होत नसल्याचे आरबीआयच्या लक्षात आल्यामुळे आरबीआयच्या मंजुरी शिवाय कर्जाचे नूतनीकरण कोणतीही गुंतवणूक करणार नाही, निधी उधार घेणे, नवीन ठेवी स्वीकारणे, वितरण यावर बंधन घातले आहे. त्यामुळे खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी बँकेचे व्यवस्थापक यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. बँकेमधून सध्या खातेदारांना १० हजार काढण्याची मुभा असल्याची माहिती देण्यात आली आहे.